बैलगाडा शर्यतीत जोरदार धडक; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना…

पुणे : शिरूर तालुक्यातील करंदी येथे आयोजित ‘करंदी केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीला गालबोट लागले आहे. धावणारा बैल पकडण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीसोबत भयंकर घडलं. या तरुणाचा बैलाची जोरात धडक बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे बैलगाडा प्रेमींमध्ये आणि कान्हूर मेसाई परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रकाश महादू फटांगडे (वय ३५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे
मिळालेल्या माहिती नुसार, करंदी येथे ‘करंदी केसरी २०२६’ या बैलगाडा शर्यतीचे मोठे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीचा थरार सुरू असताना, कान्हूर मेसाई येथील दादाभाऊ पुंडे यांचा बैलगाडा धावून घाटाबाहेर आला.

यावेळी वेगाने येणारे बैल पकडण्यासाठी प्रकाश महादू फटांगडे हे पुढे सरसावले. मात्र, बैलाचा वेग इतका प्रचंड होता की, प्रकाश यांना बैलाची जोरात धडक बसली आणि ते जमिनीवर कोसळले.

धडक बसल्यानंतर प्रकाश फटांगडे गंभीर जखमी झाले. उपस्थित नागरिकांनी आणि आयोजकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. प्रकाश फटांगडे हे कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील रहिवासी होते.