ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून FRP मध्ये वाढ, किती दर मिळणार? जाणून घ्या…

नवी दिल्ली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक दिलासायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आगामी २०२५-२६ च्या साखर हंगामासाठी उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) ४.४१ टक्क्यांनी वाढवून ३५५ रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे.
यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे देशभरातील सुमारे पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाशी संबंधित सुमारे पाच लाख कामगारांना फायदा होईल. ही वाढ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या २०२५-२६ हंगामासाठी लागू असेल. याबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले की, या निर्णयामुळे ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळेल.
उसापासून मिळणारी साखर १०.२५ टक्के असेल, तर एफआरपी ३५५ रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. सरकारने शेतकऱ्यांना किमान किंमत मिळेल याचीही खात्री केली आहे. साखरेची वसुली ९.५ टक्के असेल, तर शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३२९.०५ रुपये दर दिला जाईल.
साखरेची वसुली यापेक्षा कमी असेल, तर या रकमेत आणखी कपात केली जाणार नाही. हा दर १०.२५ टक्केच्या मूळ पुनर्प्राप्ती दरावर लागू असेल आणि वसुलीत प्रत्येक ०.१ टक्का वाढीसाठी, प्रति क्विंटल ३.४६ रुपये अतिरिक्त रक्कम दिली जाईल.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत आता हे दर लागू झाल्यानंतर ते देणे गरजेचे आहे. याबाबत देखील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.