तुळजाभवानी मातेचे अलंकार गायब प्रकरणी सात जणांवर अखेर गुन्हे दाखल ! महादेव जाणकरांनी विधिमंडळात प्रश्न मांडल्यानंतर गुन्हा दाखल….!!

धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मौल्यवान अलंकार गायब प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आला असून त्यामध्ये पाच जण मयत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तुळजाभवानी मातेचे प्राचीन व मौल्यवान अलंकार गायब प्रकरणी आमदार महादेव जानकर यांनी सोमवार विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. श्री तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट व इतर दागिने गहाळ झाले आहेत. या प्रकरणी कारवाईची त्यांनी मागणी केली होती. यावर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तत्परतेने शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधले होते.
या सर्व प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी तक्रार देऊनही अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कारवाई करण्यात येईल, असे सभागृहात सांगितले होते. त्यानंतर गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, तुळजाभवानी मातेचा प्राचीन व मौल्यवान अलंकार गहाळ झाल्या प्रकरणात मंदिराचे व्यवस्थापक तहसीलदार सोमनाथ माळी यांनी 13 डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, तत्काळ गुन्हा दाखल न करता प्रकरण चौकशीवर ठेवल्याचे सांगत चौकशीअंती निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, थेट विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाल्याने अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.