अतिमुसळधार पाऊस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत धुमाकूळ घालणार, जाणून घ्या..

मुंबई : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून कोकणात जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज मुंबईसह ठाणे आणि कोकण परिसराला यलो अलर्ट देण्यात आला आहे. सुरुवातीला दाखवलेले रंग आणि पूर्वमौसमी आगमन पाहता पाऊस दमदार हजेरी लावेल असे वाटत होते.
मात्र त्याने मध्यंतरात सुट्टी घेतल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आणि चाकरमान्यांपासून गृहिणींना काळजीने ग्रासले. पाण्याच्या टंचाईचा धोका ऐन पावसाळ्यातच निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, आता पाऊस पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या १४ जूनपासून महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होईल. १२ जूनपासूनच काही भागांत वाऱ्यासह हलकासा पाऊस सुरू होणार असून १७ जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना गुरुवारी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर अधिक राहील. तसेच शनिवारी कोकण व तळ कोकणात पावसाची जबरदस्त हजेरी अपेक्षित आहे, तर रविवारी त्याचा प्रभाव वाढेल.