20 वर्षांनंतर ओमराजेंच्या वडिलांना न्याय नाही? पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबला, आता २० जूनकडे राज्याचे लक्ष

धाराशिव : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात सोमवारी मोठी घडामोड घडली. विशेष सत्र न्यायालयाकडून आज निकाल जाहीर होण्याची अपेक्षा असताना न्यायालयाने निर्णय राखून ठेवत अंतिम निकालासाठी २० जूनची तारीख निश्चित केली. त्यामुळे तब्बल दोन दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या निंबाळकर कुटुंबीयांसह संपूर्ण राज्याचे लक्ष आता २० जूनकडे लागले आहे.

मुंबईतील विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान या प्रकरणातील सर्व आरोपी उपस्थित होते. मुख्य आरोपी आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रुग्णवाहिकेतून न्यायालयात पोहोचले. इतर आरोपींनीही न्यायालयात उपस्थिती लावली. सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल तयार करण्यासाठी आणखी काही कालावधी आवश्यक असल्याचे सांगत निर्णय २० जूनपर्यंत पुढे ढकलला.
पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या हत्येची घटना राज्यभरात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. या प्रकरणात माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. गेल्या २० वर्षांत या खटल्यात अनेक टप्प्यांवर सुनावण्या, साक्षीदारांचे जबाब, विविध याचिका आणि कायदेशीर प्रक्रियांमुळे प्रकरण लांबत गेले. त्यामुळे या निकालाकडे केवळ संबंधित कुटुंबीयच नव्हे तर राजकीय वर्तुळही उत्सुकतेने पाहत आहे.

दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. वडिलांच्या हत्येनंतर दोन दशकांहून अधिक काळ न्यायासाठी संघर्ष सुरू असल्याचे सांगताना त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. हा केवळ एका कुटुंबाचा लढा नसून सत्तेचा गैरवापर, राजकीय प्रभाव आणि सामान्य माणसाच्या न्यायाच्या हक्काविरोधातील मानसिकतेविरुद्धचा संघर्ष असल्याचे त्यांनी म्हटले.

न्यायालयाचा अंतिम निर्णय आता २० जून रोजी जाहीर होणार असून या निकालामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या या खटल्याचा शेवट कोणत्या दिशेने होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.