बीड जिल्ह्यात खळबळ! शाळकरी मुलाला संपवत झाडाला टांगला मृतदेह, कारण…

बीड : बीडमधून एक धक्कादायक घटना घटना समोर आली आहे. माझ्या शेतातून कशाला जातोस म्हणत अवघ्या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
त्यानंतर त्या मुलाने आत्महत्या केली असे वाटावे यासाठी ओढणीच्या साहाय्याने झाडाला टांगल्याची घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस हद्दीत काल सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत माहिती अशी की, नित्रुड येथील इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी गुलाम मोहम्मद मुर्तजा शेख हा १५ वर्षीय मुलगा त्याची लहान बहीण सिमरन आणि छोटा भाऊ असेफर यांना सोबत घेऊन आपल्या आजोबांच्या शेतात मंगळवारी सकाळी सात वाजता सरपण आणण्यासाठी गेला होता.
शेतात जात असताना दत्ता माणिक डाके यांच्या शेतात कैलास डाके, महादेव डाके, हनुमंत वानखेडे या तिघांनी त्याचा रस्ता अडवला. शेतातून का जातोस म्हणत गुलामला त्यांनी मारहाण केली.
ओढणीने तिघेजण गुलामचा गळा आवळत असताना घाबरलेल्या सिमरन आणि उसेफर याने घराकडे पळ काढला. घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. गुलामचे वडील मुर्तजा शेख यांच्यासह नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
यावेळी शेतात लिंबाच्या झाडाला गुलामचा मृतदेह लटकवलेल्या अवस्थेत नातेवाईकांना आढळला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.