काळजी घ्या! राज्यात पुढील ४८ तासात वाढणार थंडी, थंड वारे वाहणार, जाणून घ्या…

पुणे : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांचे तापमान सातत्याने १० ते १४ अंश सेल्सिअसवर आले आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागासह शहरी भागात शेकोट्या पेटविल्या जात आहे. आता हवामान विभागाने थंडी संदर्भात अपडेट दिले आहे.
पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. थंडीचा जोर वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहे.अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती असल्याने ही थंडी निर्माण झाली आहे.
सध्या उत्तरेकडे थंड वारे सुरु असून त्याचा प्रवास राज्याच्या दिशेने सुरु झाला आहे. या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. थंडी आणण्यासाठी कमी दाब क्षेत्रही सध्या मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात अस्तित्वात येत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
पुणे शहरात सकाळच्या धुक्यातही वाढ झाली असून पुण्यात थंडीचाही प्रभाव जाणवत आहे. पुणे शहराचे तापमान १४.९ अंशावर आहे. राज्यात सर्वात कमी तापमान विदर्भात नोंदवले गेले. गोदिंयाचे तापमान ९ अंश सेल्सियस होते. मुंबईतील तापमान २३.२ अंशावर आले असली तरी सकाळी गार वारे वाहत आहेत.
यामुळे समुद्र किनारी फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नागपूरचे तापमान १०.६ तर नाशिकचे तापमान १५ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे. मात्र, कडाक्याच्या थंडीमुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात तरी निसर्गाची साथ मिळेल अशी अपेक्षा वाढली आहे.