6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करा! संभाजी भिडेंचे वक्तव्याने खळबळ, शिवप्रेमी संतापले..

पुणे : संभाजी भिडे गुरुजी यांनी नुकतेच केलेले एक वक्तव्य सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांनी 6 जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करण्याची मागणी केली आहे. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. संभाजी भिडे यांनी म्हटले की, 6 जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा राजकारणासाठी वापरला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम तिथीप्रमाणेच पार पडले पाहिजेत. हा सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला हवा, असे त्यांनी सांगितले आहे. या वक्तव्याने अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
शिवरायांच्या इतिहासाला आणि त्यांच्या स्मृतींना महाराष्ट्रात नेहमीच विशेष स्थान आहे. यासोबतच रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केले आहे, ज्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. यामुळे आता शिवप्रेमी संतापले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात वाद वाढण्याची शक्यता आहे.

सध्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबतही भिडे यांनी आपले मत मांडले. वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको, पण त्याच्यावरून राजकारण करू नये. त्यांनी याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे.
ते म्हणाले, जे इतिहास संशोधक वाघ्याबद्दल बोलतात, त्यांचे दावे कितपत खरे आहेत, याची तपासणी व्हायला हवी, असे भिडे यांचे म्हणणे आहे. या वक्तव्याने इतिहासप्रेमी आणि संशोधकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. यामुळे येणाऱ्या काळात राज्य सरकार काय भूमिका घेणार हे लवकरच समजणार आहे.