मोठी बातमी! तरुणांनो लागा कामाला, फेब्रुवारीनंतर राज्यात १० हजार पोलिसांची भरती, जाणून घ्या संपूर्ण नियोजन…

मुंबई : राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. यामुळे तरुणांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. याबाबत अपर महासंचालकांनी सर्व पोलिस आयुक्त व ग्रामीणच्या पोलिस प्रमुखांकडून डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविली आहे.

सध्या राज्यात लोकसंख्या वाढत असतानाच पोलिसांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे पोलिस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या रिक्त पदांची बिंदुनामावली तपासली जात आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे.
त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अपर महासंचालकांनी माहिती मागवली आहे. या पोलिस भरतीचा मैदानाची टप्पा साधारणत: पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन सुरु आहे. यामुळे इच्छुकांनी आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे. गेल्यावेळी १७ हजार पोलिस पदांसाठी राज्यभरातून तब्बल १८ लाखांपर्यंत अर्ज आले होते.

यावेळीदेखील अर्जांची स्थिती अशीच राहील, असे मानून भरतीचे नियोजन केले जात आहे. याबाबत अपर पोलिस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके राजकुमार व्हटकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविली आहे.
त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल. त्यानुसार काही दिवसांत भरती प्रक्रिया सुरु होईल. राज्य राखीव पोलिस बलाकडील रिक्त पदांचीही (आरक्षणानुसार) माहिती संकलित केली जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून तयारी करावी लागणार आहे.
