लाडकी बहीण योजनेत आता पाच टप्प्यांमध्ये होणार अर्जांची छाननी, लाडक्या बहिणींचे टेंशन वाढलं..

मुंबई : राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सतत चर्चेत असते. आता योजनेतील सर्व लाभार्थी महिलांच्या अर्जांची तपासणी पुन्हा एकदा केली जाणार आहे. यामध्ये पाच टप्प्यांमध्ये ही अर्जांची छाननी केली जाणार असून यामध्ये लाखो बहिणींचे अर्ज अपात्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकार या योजनेंतर्गत काही नवे नियम लागू केले. त्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिला योजनेतून बाद करण्यात आल्या. राज्याच्या तिजोरीवर भार पडू नये म्हणून या नव्या अटी लागू करण्यात आल्याचेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले. आताही राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेत पुन्हा नव्या अटी लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे असंख्य लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलावार आहे. आता लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांच्या अर्जांची तपासणी पुन्हा एकदा केली जाणार आहे. त्या अर्जांची तपासणी सुरूही झाली आहे. पाच टप्प्यांमध्ये ही अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यात महिलांच्या कुटुंबांच्या उत्पन्नाची तपासण केली जाणार आहे.
आतापर्यंत योजनेत अपात्र ठरलेल्या ९ लाखांहून अधिक अर्ज रद्द करण्यात आले आहेत. आता हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता असून, तब्बल ५० लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चारचाकी वाहन आहेत अशा लाभार्थी महिलांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लाभार्थी महिलांनी आवश्यक कागदपत्रांची शहानिशा करून अर्ज केले आहेत का, याची खात्री करून घेणे गरजेचे ठरत आहे
महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी नसतानाही ज्या महिलांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेतला आहे, अशाही महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. सरकारकडून अर्जांची काटेकोर तपासणी सुरू असून, पात्रतेच्या निकषांमध्ये न बसणा-या महिलांचे अर्ज रद्द करण्यात येत आहेत. अशा महिलांना यापुढे योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही.
तसेच काही महिलांना मागील दोन महिन्यांपासून योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यांचे अर्ज आधीच बाद करण्यात आले असून, त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात निधी जमा होणे थांबले आहे. यामुळे येणाऱ्या काळात अजून महिलांना या योजनेपासून वंचीत राहावे लागणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.