Amit Shah : लोकसभा निवडणुकीआधी देशात CAA कायदा लागू करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा..

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (ता.१०) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीआधी देशात सीएए कायदा लागू करणार असल्याची मोठी घोषणा अमित शहांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल आणि त्याची अंमलबजावणीही केली जाईल, असे त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, सीएए ची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही, असे वक्तव्य गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पश्चिम बंगालच्या भेटीदरम्यान अमित शहांनी केलं होतं.
डिसेंबर २०१९ मध्ये संसदेने या कायद्याला मंजुरी दिली होती. यानंतर देशभरात मोठा गदारोळ झाला होता. विशेषता मुस्लिम बांधवांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. ठिकठिकाणी आंदोलने झाली होती. आता पुन्हा एकदा या कायद्याच्या अंमलबजावणीची घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली असली तरी कोणाचेही नागरिकत्व या कायद्यामुळे रद्द होणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
अमित शाह म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायदा हे काँग्रेसचे वचन होते. देशाची फाळणी झाली तेव्हा देशातील अल्पसंख्याकावर अत्याचार झाले. तेव्हा काँग्रेसने निर्वासितांचे भारतात स्वागत करून त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते आता मागे हटत आहेत. हा कायदा लागू झाल्यानंतर कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. Amit Shah
ते पुढे म्हणाले की, देशातील अल्पसंख्याकांना आणि विशेषतः मुस्लिम समुदायातील लोकांना त्यांचे नागरिकत्व काढून घेतले जाईल, असे भडकवले जात आहे. परंतु, सीएएमुळे कोणाचेही नागरिकत्व हिसकावून घेतले जाणार नाही. कारण तशी तरतूदच नाही. सीएए हा बांगलादेश आणि पाकिस्तानमधील निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी कायदा आहे.
३१ डिसेंबर २०१४ च्या आधी पाकिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देणे या कायद्याचे उद्दीष्ट आहे. असे देखील अमित शहा म्हणाले आहे