अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे निधन, विधानभवनात सगळ्यांना भेटले अन्…

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ते मुंबईतील वरळी येथे राहत होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. ते अजित पवारांकडे मागील दहा वर्षे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत होते.

त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात शोक पसरला आहे. देशमुख यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी साडेआठ वाजता मुंबई दादर येथे अंत्यविधी होणार आहे.
संजय देशमुख यांच्या निधनामुळे अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. “मागील दहा वर्षांहून अधिक काळ माझे जनसंपर्क अधिकारी म्हणून उत्कृष्टपणे काम पाहणारे श्री. संजय देशमुख यांच्या आकस्मिक निधनानं अतीव दुःख झालं, असे अजित पवार म्हणाले.

त्यांच्या जाण्यानं समर्पक आणि सखोल लिखाण करणारा एक विश्वासू, अनुभवी सहकारी मी गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि माझे कुटुंबिय सहभागी आहोत, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

संजय देशमुख यांच्या निधनामुळे अजित पवार कार्यालयातील लोकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पत्रकार मित्र संदीप कांबळे यांनी सांगितले की, त्यांनी देशमुख सरांसोबत शुक्रवारी विधानभवनात जेवण केले होते. ती त्यांची शेवटची आठवण ठरली. संदीप कांबळे म्हणाले, “संजय देशमुखसर म्हणजे माझं प्रेरणास्थान… सर, तुम्ही अचानक सोडून गेलात हे मनाला पटत नाही.
संजय देशमुख हे अनेक पत्रकारांना परिचित होते. ते पत्रकारांना माहिती देऊन मदत करत असत. त्यांनी यापूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे OSD म्हणून काम केले होते.
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी पत्रकारांशी चांगले संबंध जोडले होते. अजित पवार यांच्यासारख्या राज्यातील बड्या नेत्यासोबत कार्यरत असतानाही ते कायम प्रसिद्धीपासून कायमच दूर राहिले होते . सातारा जिल्ह्यातील उंब्रज गावचे ते सुपुत्र होते.