‘घोडगंगा’च्या मदतीला अजित पवार आले धावून! कामगारांच्या थकित २५ कोटी रक्कमेवर तोडगा काढणार …!

शिरूर : येथील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याकडून सुमारे २५ कोटी रुपये हे कामगारांचे थकीत देणे आहे. यामुळे आता कामगार आक्रमक झाले आहेत. अनेक दिवसांपासून कामगार बेमुदत संपावर असल्याने कारखान्याचे कामकाज ठप्प झाले आहे. आता अर्थिक अडचणी असलेल्या या कारखान्याच्या मदतीसाठी अजित पवार धावून आले आहेत.
घोडगंगा कारखान्याच्या थकित कामगार पगारासंदर्भात अजित पवार यांनी सोमवारी (दि.७) साखर आयुक्तांशी बैठक घेतली आहे. या बैठकीत थकीत कामगारांचा पगार व भविष्यनिर्वाहन रक्कम मिळावी अशी मागणी कामगारांनी केली आहे.
या बैठकीत कामगारांचा एक पगार देण्याबरोबरच भविष्यनिर्वाह निधीची रक्कम तत्काळ द्यावी. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याबाबत साखर आयुक्तांनी कारखाना व्यवस्थापन व कामगारांचा सामंजस्य करार करून त्यानुसार याविषयी पूर्तता करण्याच्या सूचना अजित पवार यांनी साखर आयुक्तांना दिल्या.
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, भविष्य निर्वाह निधी आयुक्त, कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार, आमदार अशोक पवार व संचालक दादापाटील फराटे आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर अजित पवार म्हणाले, काही दिवसांपूर्वी या कारखान्याचे काही सभासद आणि कामगार मला भेटले होते. तसेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही भेटले. त्या कारखान्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असून, कामगारांच्या पगारापोटीचे २५ कोटी थकले आहेत.
तेथे संप चालू असून, कारखाना कार्यालय बंद आहे. कारखान्यातून बाहेरचा माल येत नाही व आतील माल बाहेर जात नाही. सध्या योग्य त्या सूचना दिल्या आहेत.