कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; मृतांच्या अवयवांबाबत फॉरेन्सिक रिपोर्ट समोर..

मुंबई : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूप्रकरणी आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईमधील पायधुणी येथील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा या घटनेत मृत्यू झाला होता. या कुटुंबाने रात्री बिर्याणी खाल्ली. तर मध्यरात्री कलिंगड खाल्ले होते.

त्यानंतर सकाळी उलट्या आणि जुलाबाचा त्रास त्यांना झाला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला. तसेच अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता याप्रकरणात फॉरेन्सिक चाचणीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
प्राथमिक फॉरेन्सिक चाचणीमध्ये मृतांचे काही महत्त्वाचे अंतर्गत अवयव ‘हिरवट’ पडल्याचं आढळून आलं असून, यामुळे या मृत्यूंमागे एखादे मोठे षडयंत्र किंवा अत्यंत घातक विषबाधा असल्याचा संशय बळावला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, शवविच्छेदनानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत मृतांचा मेंदू, हृदय आणि आतडी यांचा रंग हिरवट झाल्याचं दिसून आलं आहे. सामान्यतः साध्या अन्न विषबाधेत अशा प्रकारे अंतर्गत अवयवांचा रंग बदलत नाही. त्यामुळे हा प्रकार एखाद्या अत्यंत विषारी रासायनिक घटकाचा शरीरात शिरकाव झाल्यामुळे घडला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.

या प्रकरणातील दुसरा धक्कादायक खुलासा म्हणजे, मृत अब्दुल्ला यांच्या शरीरात ‘मॉर्फिन’ आढळून आले आहे. मॉर्फिन हे एक अत्यंत शक्तिशाली वेदनाशामक औषध आहे, जे सामान्यतः शस्त्रक्रिया किंवा तीव्र कर्करोगाच्या वेदना कमी करण्यासाठी वैद्यकीय देखरेखीखाली वापरले जाते. मात्र, अब्दुल्ला यांच्या शरीरात हे औषध कसं काय आलं? याचा तपास आता पोलीस करत आहेत.