पुण्यात 14 दिवस ‘हाय अलर्ट’; मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू, राहुल गांधींच्या कार्यक्रमावरही अनिश्चिततेची छाया

पुणे : पुणे शहरात येत्या दोन आठवड्यांसाठी पोलिसांनी सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देत मोठी प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. 18 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी लागू राहणार आहे. या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक असेल. तसेच मोर्चे, रॅली, आंदोलने, निदर्शने आणि मिरवणुकांवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अंतर्गत जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार विनापरवानगी गर्दी केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. शहरात शांतता भंग होईल अशा कोणत्याही प्रकारच्या कृतींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड, ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटक साहित्य बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

याशिवाय भडकाऊ भाषणे, समाजात तणाव निर्माण करणारी घोषणाबाजी, पुतळे जाळणे किंवा अफवा पसरवणाऱ्या सोशल मीडिया पोस्टवरही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांच्या मते, आगामी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, ईद-ए-मिलादसह विविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.


दरम्यान, याच कालावधीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधणारा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम प्रस्तावित असल्याने या कार्यक्रमाला परवानगी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जमावबंदीच्या आदेशामुळे राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
पुणे पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, पुढील 14 दिवस शहरातील प्रत्येक मोठ्या सार्वजनिक हालचालीवर विशेष नजर ठेवली जाणार आहे. शहरात शांतता राखण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाल्याचे या निर्णयातून स्पष्ट होत आहे.