15 ऑगस्टला महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ! 14 जिल्ह्यांना अलर्ट; कुठे बरसणार धो-धो पाऊस?

पुणे : महाराष्ट्रात सध्या पावसाचे असमान वितरण पाहायला मिळत आहे. काही भागांत जोरदार पाऊस सुरू असताना, काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही अपेक्षित पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार 15 ऑगस्टला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे.
कोकणात काय स्थिती?
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसाठी 15 ऑगस्टला कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, आकाश ढगाळ राहू शकते.

उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक परिसरात काही ठिकाणी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे. बहुतांश भागांत ढगाळ आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.


पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर
मध्य महाराष्ट्रासाठी 15 ऑगस्टला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा कायम
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी 15 ऑगस्टला कोणताही मोठा हवामान इशारा देण्यात आलेला नाही. काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता असून, अनेक भागांत ढगाळ वातावरण राहू शकते.
विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज
विदर्भातील अनेक जिल्ह्यांत 15 ऑगस्टला जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 15 आणि 16 ऑगस्टला विदर्भासाठी हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
एकंदरीत, 15 ऑगस्टला महाराष्ट्रातील हवामानात विभागनिहाय मोठी तफावत पाहायला मिळणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर राहण्याची शक्यता असताना, कोकण आणि मराठवाड्यात तुलनेने कमी पावसाची स्थिती राहू शकते. हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या ताज्या सूचनांकडे लक्ष ठेवावे.