धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात मोठी राजकीय हालचाल; देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं

मुंबई : शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या 1 महिन्यापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं.
कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली होती. त्यासाठी 20 जुलै रोजी संसदेवर भव्य असा मोर्चा देखील काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये विद्यार्थी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तसेच आंदोलकांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला, यामुळे देशभरात वातावरण चांगलंच तापलं.

तसेच 20 जुलैला जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या बेछूट लाठीमारानंतर देशभरात या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद वाढला होता. तसेच काँग्रेससह विरोधी पक्षही या मुद्द्यावरुन आक्रमक झाले होते. सोनम वांगचूक यांनी आमरण उपोषण मागे घेऊनही या आंदोलनाची धग कमी झाली नव्हती.


उलट या आंदोलनाचे लोण अन्य राज्यांमध्ये पसरले होते. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना अखेर नाईलाजाने का होईना केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर महाराष्ट्रात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्त्वाने दिल्लीत इतक्या तातडीने का बोलावून घेतले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतरच याबद्दलचा तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार पहाटेच पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आषाठी एकादशीनिमित्त आपल्या पत्नीसमवेत पांडुरंगाची महापूजा केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीवेळापूर्वीच दिल्लीत पोहोचले आहेत. आषाढी वारीची शासकीय महापूजा झाल्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास मुख्यमंत्री सोलापुरातून दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अद्याप देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, उद्या नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर रविवारी ठाकरे बंधूंकडून मुंबईत तिरंगा मार्चची हाक देण्यात आली आहे. या मोर्चाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे.