धक्कादायक आकडे समोर! दहावीच्या पुरवणी परीक्षेत 10 पैकी 7 विद्यार्थी नापास; नाशिकची बाजी, कोकण तळाला


मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. यंदा राज्याचा निकाल केवळ 29.53 टक्के लागल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात 6.96 टक्क्यांची घसरण झाली असून, पुरवणी परीक्षेला बसलेल्या 10 पैकी जवळपास 7 विद्यार्थ्यांना यश मिळालेले नाही, हे आकडे विशेष लक्षवेधी ठरले आहेत.

यंदा पुरवणी परीक्षेसाठी 52 हजार 880 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 51 हजार 313 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले, तर 15 हजार 157 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उर्वरित विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. मुख्य परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना दुसरी संधी देणाऱ्या या परीक्षेतही मोठ्या प्रमाणात अपयश आल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. 34.60 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांचा निकाल 27.75 टक्के इतकाच राहिला. प्रत्यक्षात 10 हजार 224 मुले आणि 4 हजार 933 मुली उत्तीर्ण झाल्या.

विभागनिहाय कामगिरीत नाशिक विभागाने 41.45 टक्के निकालासह राज्यात अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर नागपूर (39.42%), लातूर (34.55%), छत्रपती संभाजीनगर (34.27%) आणि अमरावती (30.36%) या विभागांनी तुलनेने चांगली कामगिरी केली. मात्र पुणे विभागाचा निकाल 23.99 टक्के, कोल्हापूरचा 18.53 टक्के, मुंबईचा 17.73 टक्के आणि कोकणचा अवघा 12.26 टक्के लागल्याने हे विभाग मागे राहिले.

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी आणि सचिव डॉ. दीपक माळी यांनी निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असून, गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या निकालातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे 18 हजार 482 विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झाले असले तरी त्यांना एटीकेटी (ATKT) सवलतीद्वारे अकरावीमध्ये प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचणार आहे.

यंदाच्या निकालाने राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पुरवणी परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शेवटची मोठी संधी मानली जाते. मात्र निकालातील घसरण, विभागनिहाय असलेली मोठी तफावत आणि कमी यशाचे प्रमाण यामुळे आता शाळा, शिक्षक, पालक आणि शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे नव्याने लक्ष द्यावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!