चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार? दिल्लीत हालचालींना वेग; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय खळबळ


मुंबई : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या नावांचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्रीपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू असल्याचा दावा केला जात आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवली जाऊ शकते, असा दावा राऊत यांनी केला.

“मला दिसणाऱ्या राजकीय चित्रानुसार विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते आहेत. सर्वांशी संवाद ठेवणारे आणि परिस्थिती सांभाळून घेणारे नेते म्हणून ते पुढे येऊ शकतात,” असे राऊत म्हणाले.
तसेच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा करत राऊत यांनी गिरीश महाजन यांच्या नावावरही भाष्य केले. “जर फडणवीस केंद्रात गेले, तर बावनकुळे यांच्या नावाचा विचार आणि शिफारस स्वतः देवेंद्र फडणवीस करतील, असे माझे आकलन आहे,” असे राऊत यांनी सांगितले.