रात्रीचा सापळा, दरोड्याचा डाव अन् टोळीतील 5 जण अटकेत; आंदेकर गँगचा प्लॅन फसला!

अहिल्यानगर : रात्रीच्या अंधारात मोठा गुन्हा घडण्यापूर्वीच अहिल्यानगर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत कुख्यात आंदेकर टोळीचा संपूर्ण डाव उधळून लावला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने मिरावली पहाड परिसरात टाकलेल्या अचानक छाप्यात टोळीतील पाच जणांना अटक करून मोठा अनर्थ टाळला. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी झडती घेतली असता मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये चार पिस्टल, दहा जिवंत काडतुसे, एक कोयता आणि एक चाकू असा धोकादायक शस्त्रसाठा सापडला आहे. या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ७६ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात मुश्ताक शेख, विराट मेहंदळे, समर्थ माडळकर, समर्थ दूधभाते आणि आकाश पवार यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात हे सर्व आरोपी संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या वेळेवर कारवाईमुळे मोठा गुन्हा घडण्यापासून रोखला गेला आहे.

तपासात पुढे असेही समोर आले आहे की अटक करण्यात आलेल्या समर्थ माडळकर आणि समर्थ दूधभाते यांच्यावर पुणे शहरात खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे आणि मकोका अंतर्गत गंभीर गुन्हे आधीपासून दाखल आहेत. त्यामुळे ही टोळी केवळ एका जिल्ह्यापुरती मर्यादित नसून त्यांचे जाळे अनेक शहरांपर्यंत पसरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर सध्या धुळे कारागृहात तर त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर नंदुरबार कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. दोघांवर खंडणी आणि खून यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असून मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे. तरीही कारागृहातून टोळीचे नेटवर्क सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारागृह प्रशासनाला पत्र लिहून आंदेकर टोळीवर कठोर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे टोळीच्या हालचालींना मोठा धक्का बसला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.