आनंदाची बातमी! ‘या’ जिल्ह्यातील ४५ हजार रेशनकार्डधारक कुटुंबांना दरवर्षी मोफत साड्या; यादीत तुमचं नाव आहे का?

ठाणे : महिलांना दरवर्षी मोफत साडी देण्यात येणार असून ठाणे जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना थेट लाभ मिळणार आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या पुढाकारातून ‘कॅप्टीव्ह मार्केट’ योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यांमधील एकूण ४८ हजार ७०४ अंत्योदय कुटुंबांना मोफत साडी देण्यात येणार आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव मस्केपाटील यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अंत्योदय योजनेअंतर्गत आधीच मोफत अन्नधान्य दिले जाते. आता त्यात भर म्हणून मोफत साडीचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, या साड्यांसोबत कापडी पिशवीही देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना दैनंदिन वापरासाठी आवश्यक वस्तूंची मदत मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाला ‘नोडल एजन्सी’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. महामंडळाच्या माध्यमातून साड्यांचा पुरवठा थेट तालुकास्तरीय गोदामांपर्यंत केला जात आहे. यामुळे वितरण प्रक्रिया अधिक सुलभ आणि व्यवस्थित पार पडत आहे.

साड्यांचे वाटप पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी ‘ई-पॉस’ मशीनचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. प्रत्येक लाभार्थ्याला दिलेल्या साडीची नोंद ‘एई-पीडीएस’ पोर्टलवर ऑनलाइन करण्यात येणार आहे. यामुळे गैरव्यवहार टाळण्यास मदत होणार आहे.