मुंबईत अग्नितांडव! झोपड्यांना भीषण आग, होरपळून तिघांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता..

मुंबई : मुंबईतील भाईंदरमध्ये अनधिकृत झोपड्यांना शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये तिघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक येथील लोधा कॉम्प्लेक्सच्या मागील मोकळ्या जागेत असलेल्या झोपड्यांना शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आगीमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत.दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक नवघर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत काही तासांत आगीवर नियंत्रण मिळवले.
प्राथमिक माहितीनुसार. आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले आणि परिसरात मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ पसरले होते. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. ज्या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणी अनेक सिलेंडर ठेवण्यात आले होते. आग लागल्यानंतर झोपड्यांमधील एक एक सिलिंडरचा स्फोट झाला त्यामुळे आग वाढत गेली.

दरम्यान, या आगीत अनेक वाहने देखील जळून खाक झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.आगीमध्ये जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समोर आले नाही. पोलिस सध्या तपास करत आहेत.
