भोंदू बाबाच्या लेकीच्या लग्नात बड्या मंडळींची उपस्थिती? पाहुण्यांच्या यादीने खळबळ…

नाशिक : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अटकेनंतर अशोक खरातभोवती तपासाचा फास अधिकच घट्ट होत असून प्रकरणाला आता राजकीय आणि प्रशासकीय वळण मिळाले आहे.

दरम्यान, अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका आता विशेष तपास पथक च्या रडारवर आली आहे. या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या बड्या राजकीय नेत्यांसह वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रिकेत सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही गटांतील अनेक दिग्गज नेत्यांची नावे प्रमुख पाहुणे म्हणून छापण्यात आली होती.

विशेष म्हणजे, काही विद्यमान मंत्र्यांचाही या यादीत समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील अनेक नेते प्रत्यक्ष लग्नसमारंभाला उपस्थित राहिल्याची शक्यता वर्तवली जात असून त्यामुळे या प्रकरणाभोवतीचा संशय अधिकच गडद होत चालला आहे.
SIT कडे उपलब्ध माहितीनुसार, या लग्नसोहळ्यात केवळ राजकीय नेतेच नव्हे तर नाशिक, अहिल्यानगर, मुंबई आणि दिल्लीतील काही वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. काही आयएएस आणि आयपीएस अधिकारी पूर्णवेळ या कार्यक्रमात सहभागी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.या अधिकाऱ्यांचे अशोक खरातशी नेमके काय संबंध होते, तसेच त्यामागे कोणते आर्थिक हितसंबंध आहेत का, याचा सखोल तपास सध्या सुरू आहे.

या प्रकरणाच्या तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली असून, या विवाह सोहळ्याला केवळ राज्यातीलच नव्हे तर दिल्लीसह काही परदेशी पाहुण्यांचीही उपस्थिती असल्याचे उघड झाले आहे.
या व्हीआयपी पाहुण्यांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे काम SIT ने हाती घेतले असून, सर्वांची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीतून अशोक खरातच्या जाळ्याला नेमके कोणाकोणाचे पाठबळ होते, याचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या प्रकरणावर राज्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रिकेवर नाव असण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, मला या लग्नाबाबत काहीही माहिती नाही. ग्रामीण भागात प्रतिष्ठा म्हणून अनेकांची नावे पत्रिकेवर टाकण्याची पद्धत आहे. संबंधिताने नाव टाकताना विचारले होते की नाही, हे मला ठाऊक नाही. माझे नाव त्या पत्रिकेवर होते, हे मला आताच कळले आहे. असे त्यांनी म्हटले.