गावगाडा ठप्प होणार! येत्या 20 फेब्रुवारीला ग्रामपंचायती राहणार बंद ; काय आहे कारण?

पुणे : ग्रामपंचायत हे ग्रामीण भागातील विकास आणि सामाजिक सुरक्षेचे मुख्य केंद्र असतं. हा गावगाडा पुढे नेण्याचं काम गावचा सरपंच करत असतो. मात्र ग्रामपंचायतिचा कारभार करत असताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यातील ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून 20 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या दिवशी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्याने दिवसापासून गावस्तरावरील अडचणी सोडवण्यासाठी भारतीय सरपंच परिसर शासन दरबारी लढा देत आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी आता अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून 20 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलनीची इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयांचे कामकाज पूर्णतः ठप्प राहणार असून नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
प्रमुख मागण्या काय?

* ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे, त्या ठिकाणी तातडीने निवडणुका घेण्यात याव्यात किंवा तोपर्यंत प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती करण्यात यावी
•. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या सदस्यांच्या निवडणुकीत सरपंचांनाही मतदानाचा अधिकार देण्यात यावा.
* जिल्हा नियोजन समितीवर सरपंचांना प्रतिनिधी म्हणून संधी देण्यात यावी, जेणेकरून ग्रामीण भागाच्या विकासाशी संबंधित निर्णय प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग राहील.
* निवडणूक प्रक्रियेशी संबंधित तीन अपत्यांचा कायदा रद्द करून त्याबाबत सुधारित निर्णय घेण्यात यावा.
दरम्यान शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास उपोषणासारखे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ग्रामपंचायतींच्या कारभाराशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या आंदोलनामुळे राज्यातील ग्रामपंचायत स्तरावरील कारभार, विकासकामे आणि नागरिकांशी संबंधित अनेक सेवा ठप्प होण्याची शक्यता असून शासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.