महावितरणच्या थेऊर शाखेचा गलथान कारभार, २५ ते ३० घरे आठवड्यातून दोन ते तीन दिवस अंधारात…


लोणी काळभोर : महावितरणच्या थेऊर शाखेच्या गलथान कारभारामुळे हवेली तालुक्यातील मांजरी – कोलवडी शिवरस्त्यानजीकच्या ग्रामपंचायत कोलवडी परिसरात असलेल्या स्टार सिटी सोसायटी येथे असलेली सुमारे २५ ते ३० घरे आठवड्यातून दोन ते तीन दिवस अंधारात असतात. महावितरणच्या कारभाराने येथे राहणारे स्थानिक नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी बसवण्यात आलेल्या विद्युत रोहित्राची क्षमता कमी अन त्यावर असलेल्या वीजजोडांचा भार जास्त आहे. यामुळे वापर वा मागणीत मोठी तफावत आहे. तीन फेज पैकी सातत्याने कोणताही एक फेज बंद पडत असल्याने येथील रहिवाशी सततच्या खंडित वीजपुरवठ्याने त्रस्त झाले आहेत. त्यांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा उपलब्ध होत नाही, तसेच त्यांच्या तक्रारीची दखल वेळेत घेतली जात नाही.

यासंदर्भात रहिवासी यांनी वायरमनशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला सध्या थकबाकी वसुलीचीच कामे सांगितली आहेत, ते झाल्याशिवाय दुरुस्तीकडे लक्ष द्यायचे नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असल्याने तुमच्या तक्रारीची वेळेवर दखल घेऊ शकत नाही. असे अजब उत्तर दिले.

       

थेऊर येथील महावितरण शाखेला गेल्या तीन महिन्यापासून अधिकारी नसल्याने, कुंजीरवाडीचे सहाय्यक इंजिनियर अलदार यांच्याकडे थेऊरचा चार्ज आहे त्यांचेही या भागातील समस्यांकडे म्हणावे असे लक्ष नाही. त्यामुळे थेऊर महावितरण कर्मचारी आणि अधिकारी यांचे वीज पुरवठ्याबाबतीत दुर्लक्ष होत असल्याने येथील गावांची अक्षरशः पराकोटीची गैरसोय होत असताना देखील याकडे महावितरणचे दुर्लक्ष होण्याने जनता त्रस्त झाली आहे.

विशेष बाब म्हणजे या भागात सध्या ऊसतोड सुरू असून, ऊसतोडणी मजूर झोपड्या बांधून राहावयास आहेत. ते लोक आकडा टाकून सर्रास वीज जोड घेऊन वीजेचा वापर करत आहेत. परंतु जे रहिवासी रितसर वीजजोड घेऊन विजेचा वापर करतात , त्यांना वीज उपलब्ध होत नाही. रोहित्राची क्षमता कमी असल्याने सतत फ्यूज उडत असतो. रात्री अपरात्री कधीही वीज जात असते.

त्यामुळे येथील लोकांना पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत आहे. शेतीचा परिसर असल्याने साप विंचवांचा उपद्रव भेडसावत असतो. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोलवडी परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला असल्याने नागरिक भिंतीच्या छायेत वावरत आहेत.

यासंदर्भात वीज कर्मचाऱ्यांना वारंवार कळवूनही दखल घेतली जात नाही. वरिष्ठांना कळवले तर मोघम उत्तर देऊन टाळाटाळ करत असतात. यामुळे रहिवासी हतबल झाले आहेत. याची दखल वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. अन्यथा सर्व रहिवाशांना आंदोलन करण्याशिवाय गत्यंतर नाही , असे रहिवासी व्यक्त करत आहेत.

प्रभाकर क्षिरसागर (स्थानिक रहिवासी) –

गेले दोन दिवस रात्री आम्हाला वीज पुरवठा होत नाही. परंतु ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्यांना आकडा टाकून वीज पुरवठा होत आहे. तीन फेज पैकी एक फ्यूज उडाला की ते लोक दुसऱ्या तारेवर आकडा टाकून वीज घेत असतात. आम्हाला मात्र रितसर विज जोडणी घेऊन वीज पुरवठा होत नाही. याबाबत रितसर तक्रार दाखल करुनही दखल घेतली जात नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!