पार्थ पवारांवर गुन्हा कधी दाखल करणार? शरद पवारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सगळंच सांगितलं…

पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार चांगलेच अडचणीत आले आहेत. या जमीन व्यवहारात गैरव्यवहार उघडकीस आल्यामुळे तो रद्द झाला आहे.

तसेच १८०० कोटी मूल्य असलेली जमीन ३०० कोटी रुपयांत विकत घेतली, तसेच स्टँप ड्युटी म्हणून अवघे ५०० रुपये भरले असे आरोप पार्थ पवार यांच्या वर होत असून त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
मात्र पार्थ पवार यांच्यावर कारवाई का झाली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता ‘महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकतील, मी देऊ शकत नाही’, असे त्यांनी म्हटले. आता शरद पवारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी त्याचे कारण स्पष्टपणे सांगितलेले आहे. हा एफआयआर आहे. एफआयआर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. त्यात ज्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यांच्यावर तरच गुन्हा दाखल होतो. त्यामुळे कंपनीचे ऑथराईज सिग्नेटरी जे होते, ज्यांनी हा सगळा व्यवहार केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.
त्यासोबत सरकारमधील ज्यांनी या संदर्भात मदत केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आमचा कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही. कोणाला वाचवण्याचे कारण नाही. जे झाले ते नियमानुसार झालेले आहे. मी यापूर्वी देखील सांगितले की, या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोणाचा सहभाग आढळला तर आपल्याला कारवाई करावीच लागते. नियमानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
शरद पवार यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत म्हटले की, पार्थ पवार जमीन प्रकरण गंभीर आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर आहे असे म्हणत असतील, तर त्यासंबंधी चौकशी करुन वास्तव हे त्यांनी समाजासमोर ठेवले पाहिजे. ते काम त्यांनी करावे अशी अपेक्षा आहे. मुंढव्यातील हा जमीन व्यवहार दुय्यम निबंधकांनी रद्द केला आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्याकडे मजबूत पुरावे गोष्टी असतील, त्याआधारे निर्णय घेतला असेल, असे त्यांनी म्हटले. शरद पवार यांना शीतल तेजवानी आणि अन्य आरोपींबद्दलही विचारणा करण्यात आली.
त्यावर पवार यांनी म्हटले की, कोण तेजवानी, आणखी कोण, यांची नावं मला माहिती नाही. ज्यांनी याबाबत आरोप केले, त्यांनीच हे सगळं शोधून काढावे, असे त्यांनी म्हटले. तर पार्थ पवार यांच्यावर कारवाई का झाली नाही? असे विचारले असता महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकतील, मी देऊ शकत नाही’ असे शरद पवारांनी म्हटले.