पीएम केअर फंडातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ; संजय राऊतांची मागणी

पुणे : गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.मराठवाड्यात लाखो शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. त्यांची घर पाण्यात, शेती-जमीन वाहून गेली आहे. या पार्श्वभूमीवरच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खसादर संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ व्हावी, पीएम केअर फंडातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी मागणी राऊतांनी केली आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, काल उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा केला. ते अनेक गावात गेले, घरात गेले, बांधाच्या पलीकडेही गेले. शेतकरी त्यांची वाट पहात होते, महिला, लहान मुलं, वृद्ध, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय हे सगळे उद्धव ठाकरेंची वाट पहात होते. मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि दोन उप-उप आहेत, त्यांनी त्या दोन उपटसुंभांना घेऊन पंतप्रधांनाना भेटावं आणि मराठवाड्यातील , महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे ते सांगावं, असंही राऊत म्हणाले.
दरम्यान प्रधानमंत्री सहायता योजना म्हणजे पीएम केअर फंड नावाचा एका प्रकार नरेंद्र मोदींनी त्यांच्या कारकिर्दीत सुरू केला. जेव्हा नैसर्गिक, वैद्यकीय संकट, आपत्ती येईल, अशा वेळेला या फंडातून मोठ्या प्रमाणात मदत करता येईल म्हणून प्रधानमंत्री कार्यालयात वापर करता येईल. हा पीएम केअर फंड सरकारी आहे की खासगी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण त्याच्यातील जी रक्कम आहे ती देशाच्या बजेटपेक्षा मोठी असावी असं लोकांचं म्हणणं आहे. त्या पीएम केअर फंडात मुंबईसारख्या शहरातून सव्वा दोन लाख कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे पीएम केअर फंडातून, त्या पैशांचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
