मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव आता ‘राजगड’, ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब..


पुणे : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव आता राजगड असे करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी हा तालुका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीचा ऐतिहासिक सन्मान म्हणून घेतलेल्या या निर्णयामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. छत्रपतींच्या पराक्रमाशी, शौर्याशी आणि गड-किल्ल्यांच्या स्मृतीशी निगडित असलेल्या या परिसराचे नाव ‘राजगड’ ठेवण्यात आल्याने, या भूमीचा ऐतिहासिक वारसा अधोरेखित होणार आहे.

पायथ्याशी असलेल्या किल्ल्याचे नावच आता तालुक्याला मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्येही अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकृत घोषणा केली की वेल्हे तालुका आता ‘राजगड तालुका’ म्हणून ओळखला जाईल. महाराष्ट्राच्या स्वराज्य इतिहासात राजगड किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या काळात राजगडला राजधानी केले होते. या वारशाला योग्य तो मान मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावाला प्रशासनाकडून हिरवा कंदील देण्यात आला असून, केंद्र सरकारकडूनही मान्यता मिळाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकार लवकरच याबाबतचे राजपत्र जारी करणार आहे. त्यामुळे हा निर्णय शासकीय स्तरावर अधिकृतपणे लागू होणार आहे.

वेल्हे तालुक्यातील ७० पैकी तब्बल ५८ ग्रामपंचायतींनी तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी ठराव मंजूर केले होते. यासोबतच पुणे जिल्हा परिषदेने देखील हा ठराव मंजूर करत सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. स्थानिक जनतेचा मोठा पाठिंबा मिळाल्याने महसूल विभागाने यास मान्यता देणे सोपे झाले.

या निर्णयामुळे राजगड किल्ल्याचे ऐतिहासिक आणि पर्यटनाचे महत्त्व आणखी अधोरेखित होणार आहे. इतिहासप्रेमी आणि पर्यटक या ठिकाणी अधिक आकर्षित होतील अशी अपेक्षा आहे. पर्यटनवाढीसोबतच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!