मुंबईत पावसाने एवढा धुमाकूळ कसा घातला? पुणे वेधशाळेच्या हवामान शास्त्रज्ञांनी दिली महत्वाची माहिती…

पुणे : मुंबई पुण्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळ राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस कायम असणार आहे आणि त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा सुद्धा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक परिणाम जाणवतो आहे. या पावसामागचं खरं कारण नेमकं काय, याचा खुलासा पुणे हवामान खात्याच्या तज्ञांनी केला आहे.
पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितलं की, मध्य-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अचानक वाढलं आहे.

दरम्यान, याच वेळी मान्सूनचे वारेही सक्रिय झाले असून उत्तर कोकण ते केरळपर्यंत द्रोणी रेषा तयार झाली आहे. यामुळे कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची परिस्थिती आहे, तर उर्वरित राज्यात रिमझिम आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे.
हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे की, पुढील दोन दिवस मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. घाटमाथ्यांवरही रेड अलर्ट असून, समतल भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यात आज ऑरेंज अलर्ट असून, उद्यापासून तिथे यलो अलर्ट असेल. विदर्भातही आज ऑरेंज आणि उद्या यलो अलर्ट दिला गेला आहे. बुधवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यभरात सुरू असलेल्या पावसाची आणि पूरस्थितीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागात बैठक घेतली. त्यांनी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांशी संवाद साधून नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर आणि पूरग्रस्तांना मदत यावर भर दिला. सरकारचे लक्ष पुढील 48 तासांवर असून, या काळात अधिक सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.