‘गरज पडली तर…’ मुंबईतील कबुतरखान्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला मार्ग

मुंबई : मुंबईतील दादर आणि इतर ठिकाणचे कबुतरखाने मुंबई महापालिकेने बंद केल्यानंतर जैन समाजाने आणि पक्षीप्रेमींनी आंदोलनाचा पवित्रा घेत विरोध केला होता. आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कबुतर खान्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई महापालिकेने अचानक बंद केलेल्या कबुतरखान्यांमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे आता एक सकारात्मक दिशा समोर आली आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कबुतरखाने अचानक बंद करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी त्यांनी कबुतरांच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत नियंत्रित फिडिंग व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची सूचना केल्या आहेत. बैठकीत फडणवीस म्हणाले की, “कबुतरखान्यांमुळे आरोग्यविषयक प्रश्न उपस्थित होत असले तरी त्याचा शास्त्रीय अभ्यास गरजेचा आहे. त्याअभावी एकतर्फी बंदी योग्य ठरत नाही.” त्यांनी कबुतरांना अन्न देण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करण्याचा प्रस्ताव ठेवला.

दरम्यान, या वेळी उपस्थित असलेल्या मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गिरीश महाजन, आमदार गणेश नाईक व मंगलप्रभात लोढा यांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ‘नियंत्रित फिडिंग’ सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहे.