वीज तार तुटली असल्याचे सांगून देखील दुर्लक्ष! विजेच्या धक्क्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, गावकऱ्यांचा रास्ता रोको, कारवाईची मागणी..

छत्रपती संभाजीनगर : येथील चिकलठाणा परिसरात जुना बीड रोडवर एक धक्कादायक दुर्घटना घडली. याठिकाणी तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून शेतात मशागत करणाऱ्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी जालना रोडवर दोन तास ‘रास्ता रोको’ केला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कचरू जनार्दन दहीहंडे (वय ५४) व बाळू जगन्नाथ दहीहंडे (वय २८) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. कचरु दहीहंडे व बाळू दहीहंडे शेतात खरीप हंगामासाठी मशागतीच्या कामासाठी गेले होते. त्यांचा तुटलेल्या वीजवाहिनीला स्पर्श झाला आणि विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला. परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.
यानंतर हा प्रकार महावितरणच्या चुकीच्या कारभारामुळे झाला असल्याचा आरोप केला जात आहे. वादळी वाऱ्यामुळे शेतातून जाणारी उच्चदाबाची वीज तार १५ दिवसांपूर्वी तुटली होती. याबाबत नागरिकांनी सूचना करुनही महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळेत दुरुस्ती केली नाही. यामुळे हि घटना घडली असल्याचा आरोप केला जात आहे.
याप्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. नागरिकांनी जालना रोडवर रास्ता रोको केला. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. संतापलेल्या नागरिकांनी कुणालाही जुमानले नाही. आमदार नारायण कुचे यांच्यासह काही राजकीय कार्यकर्त्यांनी नागरिकांसह ठिय्या मारला.
नंतर पोलिसांनी मध्यस्थी करीत जमावाला शांततेचे आवाहन केले. तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दोघांचे पार्थिव घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला. रास्ता रोकोमुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
रात्री उशिरापर्यंत आंदोलन करणाऱ्या नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत होता. विजेचा धक्का लागून दोन जणांचा मृत्यू होण्याची घटना महावितरणच्या दुर्लक्षामुळे घडली. दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी स्थानिकांनी आंदोलन केले. याबाबत सध्या तपास केला जात आहे.