पुणे- दौंड रेल्वे प्रवास मुंबई , ठाण्याप्रमाणे लटकून! रेल्वे विद्युतीकरणाला नऊ वर्ष पूर्ण; मात्र लोकल सेवेची मागणी लटकूनच ….

जयदिप जाधव उरुळी कांचन : मुंब्रा रेल्वे स्थानकावर लोकल रेल्वेच्या दरवाजात लटकून प्रवास करताना झालेल्या दुर्घटनेत ४ प्रवाश्यांचा मृत्यू तर ९ प्रवाश्यांच्या जखमेची घटना ओढविल्यानंतर रेल्वेचा जीवघेणा प्रवास चर्चेत आला आहे. मुंब्रा, मुंबई प्रमाणे पुण्यातही लोकल रेल्वे प्रवासावर प्रचंड प्रवाश्यांचा ताण येत असून स्थानिक प्रवाश्यांच्या ओझ्याने लोकल रेल्वे सुविधा बुडू लागली आहे. पुण्याहून लोकल रेल्वे सुविधेच्या प्रतिक्षा असलेल्या पुणे- दौंड रेल्वे प्रवासा दरम्यान सेवेचा पूर्णतः हा बोजवारा उडाला असून सुरू न झालेली लोकल सेवा व रेल्वे वेळापत्रकाने प्रवाश्यांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.
पुण्याच्या दक्षिण व उत्तर भागात रेल्वेची मुख्य मार्गिका असल्याने नागरीकरणाचा ओघ या भागात वाढला आहे. पुण्यात वाढलेले सदनिकांचे दर व रेल्वेच्या सुविधेभोवती नागरीकांनी या भागात मोठी गुंतवणूक केली आहे. उपनगरीय सेवेला लाजवेल अशी ओघ गर्दी या प्रवासावर येऊन पडली आहे. औद्योगिक विस्तार व शिक्षणाची दालने यामुळे प्रवाश्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र या प्रवासाला रेल्वेची अपुरी संस्था व वेळापत्रक कारणीभूत ठरत असल्याने पुण्याच्या जोडलेल्या पुणे – दौंड या मार्गिकेवर प्रवाश्यांचा प्रवास अतिशय धोकादायक झाला आहे.
पुणे ते दौंड व सोलापूर मार्गावरील लोकल प्रवासी वाहतुक लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते दौंड दरम्यान विद्युतीकरण केले आहे. तर या मार्गावरून डिझेल मल्टिप्लेट युनिट (डेमो ) सुरू केली आहे. पुणे, दौंड व बारामती असाही प्रवास सुरू झाला आहे. मात्र हजारोंच्या आकड्यात प्रवासी प्रवास करीत असलेल्या या भागात अपुरी रेल्वे सुविधा व विद्युतीकरण करुनही न सुरू झालेली लोकल सेवा व प्रलंबित असलेला उपनगरीय रेल्वेचा प्रश्न या कारणांनी सेवेचा बोजवारा उडाला आहे.
सोलापूर हुन पुण्याकडे जाताना १ शटल , २ डेमो सेवा व १ एक्स्प्रेस सेवा एवढ्यापुरती मर्यादीत असल्याने दौंड पासून उरुळी कांचन पर्यंत प्रवाश्यांची रेल्वे भोवती झुंबड ठरलेली आहे. हीच परिस्थिती सायंकाळची असून मर्यादीत सुविधेमुळे प्रवाश्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
स्थानके सुधारली सेवा सुधरवा!
केंद्र सरकारने अमृत भारत मिशन अंतर्गत देशातील महत्वाच्या रेल्वे स्थानकांचा कायाकल्प केला आहे. त्यानुसार पुणे -दौंड रेल्वे मार्गावर उरुळीकांचन व दौंड रेल्वे स्थानकांचे रुप पालटले आहे. उरुळीकांचन रेल्वे स्थानकावर मोठा टर्मिनल प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र या भागात लोकल सेवेचा प्रश्न अद्याप पूर्ण होऊ शकला नाही तसेच उपनगरीय सेवेचा प्रश्नही सत्ताधारी मंडळी सोडवू शकली नाही.
‘पुणे व देशाच्या मुख्य शहरांकडे प्रवास करण्यासाठी उरुळीकांचन रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाला केंद्र सरकारने रेल्वे टर्मिनलची घोषणा केली आहे ही स्वागतार्य बाब आहे. मात्र रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण काम ९ वर्षे होऊनही लोकल रेल्वे प्रवास सुरू झाला नाही ही खेदाची बाब आहे. लांब पल्याच्या रेल्वे थांब्यासह कामगारवर्गाची गैरसोय दूर करण्यासाठी लोकल सेवा सुरू करण्यासाठी रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक व पुणे रेल्वे प्रबंधकांना पाठपुरावा करण्यात येईल’
– ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, आमदार शिरुर -हवेली.
पुणे -दौंड मार्गावर रेल्वेचे विद्युतीकरण २०१६ मध्ये होऊनही या मार्गावर लोकल रेल्वेची सुविधा मिळाली नसल्याने या भागात प्रवासी वाढून सेवा अपुरी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. रेल्वे स्थानक सुधारणेला १३ कोटी रुपये मिळाले, टर्मिनल घोषणा झाली मात्र लोकल रेल्वेसाठी सर्व तयारी होऊन लोकलची सेवा मिळत नसल्याने प्रवाश्यांना नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
- – प्रकाश जगताप, अध्यक्ष उरुळीकांचन रेल्वे प्रवासी संघ.