राज्यात पुन्हा भूकंप! जयंत पाटलांचे घर फुटलं, भाऊ आणि भाचा भाजपच्या वाटेवर, नेमकं घडतंय काय?

मुंबई : राज्यात आणखी एक मोठा राजकीय भूंकप होणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्या घरात फूट पडणार असून भाऊ आणि भाचा हे भाजपची वाट धरणार आहे. आज त्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडणार असून विशेषतः रायगडमध्ये याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

जयंत पाटील यांचे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून रायगडवर मागील काही दशकांपासून वर्चस्व आहे. असे असताना आता डाव्या चळवळीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शेकापच्या नेत्यांनी भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतल्याने याचे मोठे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. यामुळे त्यांचे वर्चस्व कमी होणार आहे.
त्यांच्या वर्चस्वाला धक्का लावण्याची तयारी भाजपने केली आहे. यामध्ये आता शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील आणि भाचा आस्वाद पाटील हे आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप एक नंबरला येणार असल्याचा दावा देखील पंडित पाटील यांनी केला आहे.

आस्वाद पाटील हे माजी आमदार मिनाक्षी पाटील यांचे सुपुत्र आहेत. विधानसभा निवडणुकीत अलिबागमधून जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. तर, या मतदारसंघातून आस्वाद पाटील यांना संधी देण्याचा आग्रह पंडित पाटील यांनी धरला होता. मात्र, जयंत पाटील यांनी सूनेलाच तिकिट दिले.
विधानसभा आणि लोकसभा निवडणूक प्रचारातून पंडित आणि आस्वाद पाटील हे दोन हात लांबच होते. याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे पंढरपूरमध्ये अधिवेशन पार पडले होते. या अधिवेशनात पंडित पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. यामुळे तेव्हापासूनच या घडामोडी घडतील असे सांगितले जात होते.
