जी-२० परिषदेसाठी प्रतिनिधींचे विमानतळावर उत्साहात स्वागत ; विविध देशातील प्रतिनिधींचे आगमन…!

औरंगाबाद : औरंगाबाद येथे G 20 परिषदेअंतर्गत 27 आणि 28 फेब्रुवारी दरम्यान जागतिक महिला परिषदेचे आयोजन होत आहे. परिषदेसाठी विविध देशातून महिला प्रतिनिधींचे आगमन होताच त्यांचे औक्षवण करण्यात आले. जिल्हा प्रशासनातील महिला अधिकाऱ्यांनी पुष्पहार आणि शाल देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी करण्यात आलेल्या पारंपरिक स्वागतातून महिला सदस्यांमध्ये विश्वास आणि आपुलकीचा संदेश निर्माण झाला. ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या जिल्ह्यात जागतिक महिला परिषद होत असल्याने राज्याची संस्कृती आणि शिष्टाचाराची ओळख झाल्याने मनामध्ये वेगळाच आनंद निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेक विदेशी पाहुण्यांनी विमानतळावर व्यक्त केली.
यावेळी केंद्रीय वित्त् राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम , उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, अंजली धानोरकर, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार ज्योती पवार, निलावाड यांच्यासह लेझीम पथकाच्या अंजली चिंचोलकर यांच्यासह मुकूंदवाडी महानगर पालिकेतील शाळेच्या 18 मुली आणि 3 वादक मुले उपस्थित होते. परिषदेसाठी विविध देशातून एकूण 38 महिला सदस्य प्रतिनिधींचे आगमन झाले आहे.
विमानतळावर आलेल्या महिला प्रतिनिधींचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी स्वागत केले. जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा आणि वेरुळ लेणीची तसेच औरंगाबाद शहराची थोडक्यात माहिती डॉ कराड यांनी शिष्टमंडळास देत दोन दिवसीय या परिषदेमध्ये तसेच विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.