मोठी बातमी! 12 वीचा निकाल जाहीर, राज्यात कोकणने मारली बाजी, सर्वात कमी निकाल कोणाचा? जाणून घ्या सर्व माहिती…

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे फेब्रुवारी–मार्च २०२६ दरम्यान घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी (HSC) परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. थोड्याच वेळापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोर्डाने निकालाची सविस्तर माहिती जाहीर केली.

यंदा बारावीचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे. विभागनिहाय निकालात नेहमीप्रमाणे कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावले असून या विभागाचा निकाल 94.14 टक्के इतका लागला आहे. तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी नोंदवला गेला आहे.
गेल्या वर्षी (२०२५) बारावीचा निकाल 91.88 टक्के होता. यंदा तो 2.09 टक्क्यांनी घसरला आहे.

यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा उत्तीर्ण टक्का 93.15% असून मुलांचा 86.80% इतका आहे.

दरम्यान, आज दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर तसेच डिजीलॉकरवर निकाल पाहता येणार आहे.
लाखो विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर
फेब्रुवारी–मार्च २०२६ दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी राज्यभरातून 14 लाख 33 हजार 058 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल आज जाहीर करण्यात आले असून, दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.