शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, पण …; मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत मोठं वक्तव्य

नागपूर:राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीवर मोठं वक्तव्य केलं आहे.कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही.आपण एक जुलैपर्यंत कर्जमाफीची योजना काय असेल? याबाबत आम्ही घोषणा करू, असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने कमिटमेंट केली आहे. आपल्यावर सध्या अतिवृष्टीचा ताण आलेला आहे. त्यामुळे आपलं बजेट अडचणीत आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत निर्णय आपण घोषित केलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही. 2017 ला आपण कर्जमाफी केली. 2020 केली. आपण कर्जमाफी केली तरीदेखील आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागत आहे. याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे. आपल्या कर्जमाफीतही आहे आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीत देखील आहे. त्यामुळे यावर एकदम उपाययोजना होणार नाहीत.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वर हळूहळू टप्प्याटप्प्याने काय उपाययोजना करता येतील आणि त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीने समिती काम करत आहे. आपण एक जुलैपर्यंत कर्जमाफीची योजना काय असेल? याबाबत आम्ही घोषणा करू, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दरम्यान सार्वजनिक उपयुक्त सुविधा, विद्युत कामे, रस्ते, इमारती, लघु व मध्यम तलाव आणि दुरुस्ती पूर्ण बांधणी या संदर्भातील कामांना देखील आपण पैसा उपलब्ध करून दिलेला आहे. त्यातल्या काही कामाची सुरुवात केली आहे. आपण पुढच्या बजेटमध्ये निधी उपलब्ध करून देऊ. शेती पिकाच्या नुकसानीकरिता जे पैसे दिले होते आणि बी बियाणांकरिता पैसे दिले होते, त्या संदर्भात दोन जीआर आपण काढले होते. त्यानुसार 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेले आहेत, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

