बीड प्रमाणे पुणे जिल्ह्यात ‘हस्तक व कलेक्टर’ यांचा बंदोबस्त होणार काय! पुणे जिल्ह्यात वर्षोनुवर्षे पोलिस ठाण्यात ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची बदली होणार काय?

जयदिप जाधव

उरुळीकांचन : बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कारवायांचा रक्तरंजित पूर्वइतिहास पाहता बीड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक नववीत कावत यांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात वर्षोनुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची मोठी उचलबांगडी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. या निर्णयाने स्थानिक सत्ताधारी नेतेमंडळींच्या आर्शिवादाने एकाच ठिकाणी गुन्हेगारांचे हस्तक बनलेल्या व अवैध धंद्यांचे वसुलीचे कलेक्टर बनलेल्या अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात हस्तकांची स्वच्छता होणार असल्याने बीड प्रमाणे पुणे जिल्ह्यात वर्षानुवर्षे एकाच पोलिस ठाण्यात व स्वग्राम तालुक्यात ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची साफसफाई होणार काय असा सवाल जिल्ह्यात उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्यातील पोलिस दलात कर्मचारी बदल्यांत जिल्हा पोलिस नवनीत कावत यांनी पारदर्शकता दाखवून जिल्ह्यात अनेक वर्षे एकाच पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या ‘ हस्तक’ व ‘कलेक्टर’ यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे वर्षोनुवर्षे पोलिस दल आपली ‘राजकीय’ जहागीर समजत असलेल्या या हस्तकांना एकप्रकारे चांगला दणका दिला आहे. या हस्तक व कलेक्टर लोकांनी पोलिस ठाणे व तालुक्याची खडणखडा माहिती ठेऊन पध्दतीशीरपणे कमाईचे साधन बनविल्याची परिस्थिती पुणे जिल्ह्यातही आहे. पुणे जिल्ह्यात एकाच पोलिस ठाण्यात व एकाच तालुक्यात २० ते २५ वर्षे पोलिस कर्मचारी नेमणूकीला असल्याची स्थिती आहे. तर काही कर्मचारी तालुका न सोडता निवृत्त झाले असल्याची पोलिस दलात चर्चा आहे.

पोलिस ठाण्यात हे पोलिस कर्मचारी प्रभारी अधिकारी यांना चिकटून संगनमताने काही सोपस्कार गोष्टी पथ्यावर पाडून घेत असल्याची आवस्था जिल्हा पोलिस ठाण्यांत आहे. ‘चमचे’ व ‘खबरी’ बनवून हे पोलिस कर्मचारी गुन्हेगारी घटना व गुन्हेगारी कारवायांत सहभाग असलेल्या गुन्हेगारांना मदत पुरवित असल्याचा काही घटना जिल्ह्यात उघड झाल्या आहेत. असे पोलिस कर्मचारी चौकशी फेऱ्यांत अडकूनही त्याच तालुक्यात सेवा बजावित असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र घरभेद्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची गरज असताना हे भ्रष्ट पोलिस कर्मचारी राजकीय संधान साधून आपली दलाली सुरू ठेवत आहेत.
बीड जिल्ह्याप्रमाणे पुणे जिल्ह्याही गुन्हेगार घटनांत कुठे कमी नसल्याचे चित्र आहे. या ठिकाणी दहशत, दादागिरी, खून, खूनाचे प्रयत्न, सावकारी, मुलींची छेड काढण्याचे प्रकार काही कमी नाहीत. मग बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पुणे जिल्ह्यात आहेत? मग पुणे जिल्ह्यात बीडप्रमाणे बदलीचा फॉर्म्युला का नको? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिस दलात पोलिस कर्मचारी असलेल्या सहाय्यक फौजदार , हवालदार व पोलिस कॉन्स्टेबल या बदल्यांत जिल्ह्यात वर्षोनुवर्षे एकाच तालुक्यात व एकाच पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यात विचार झाला की नाही अशी स्थिती आहे. जिल्ह्यात पोलिस कर्मचारी कार्यरत असताना तालुक्यात १२ वर्षे व पोलिस ठाण्यात ५ वर्षे हा बदलीचा नियमच पाळला जात नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात पोलिस सामान्यांना कायद्याचे नियम असताना पोलिसांना काही नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बीड जिल्हा अशा पोलिस कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वागण्याने बिहार झाला आहे. तशीच आवस्था पुणे जिल्ह्याची होऊ नये म्हणून पुणे जिल्ह्यात नवीन पोलिस अधिक्षकपदाची सूत्रे घेणाऱ्या संदिपसिंह गिल यांनी बीड प्रमाणे ‘हस्तक व कलेक्टर’ यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.