मोठा राजकीय भूकंप येणार? भाजप मित्रपक्षांवर चाल करणार, चर्चांना उधाण…

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली.

त्यानंतर शिवसेनेत मोठे बंड झाले आणि एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदार-खासदारांना सोबत घेत भाजपसोबत युती करत मुख्यमंत्रीपद मिळवले. ही राज्याच्या राजकारणातील एक ऐतिहासिक घडामोड ठरली.
यानंतर अजित पवार यांनीही राष्ट्रवादीतून वेगळी भूमिका घेत भाजप-शिंदे सरकारमध्ये सहभाग घेतला. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणात पक्षांतर पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते.

या साऱ्या पार्श्वभूमीवर आता एका बड्या नेत्याने राज्यात पुन्हा एकदा मोठा ‘राजकीय भूकंप’ होण्याची शक्यता व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे.

आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील.
रोहित पवार यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप कोणत्या मित्रपक्षावर डोळा ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहित पवारांचा दावा खरा ठरल्यास राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढील काळात नेमकं काय घडणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.