तुळजाभवानी मंदिराचं मुख्य शिखर हटवणार? काय आहे कारण?

पुणे : राज्यातील लाखो भाविकांच आराध्य दैवत असलेल्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच मुख्य शिखर उतरवण्याबाबत
राज्य पुरातत्व विभागाने प्राथमिक अहवाल दिला असल्याची माहिती समोर आली आहे.मंदिरातील जुन्या दगडी शिळांना मोठे तडे गेल्यामुळे गाभारा आणि शिखराला धोका असल्याचे राज्य पुरातत्त्व विभागाच्या पाहणीत समोर आले आहे. मंदिराचे मुख्य शिखर हटवण्यात येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता मंदिराचे मुख्य शिखर खाली उतरवावे लागणार का? असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असून, मंदिर संस्थेचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. मंदिराच्या शिखरावर झालेल्या संभाव्य कारवाईमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्रीय पुरातत्त्व विभागाने आतापर्यंत दोन स्वतंत्र अहवाल सादर केले असून, यात तात्पुरती डागडुजी करून संरचना सुरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, मंदिर संस्थान शिखराबाबत कायमस्वरूपी उपायाची मागणी करत आहे. यासंदर्भात तिसरा आणि अंतिम अहवाल आल्यानंतरच शिखर उतरवण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंदिर संस्थांचे विश्वस्त यांनी सांगितली आहे.
