पवारांचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार? थेट बैठकीतून मोठी माहिती आली समोर…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचे सावट आले आहे. विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

तसेच अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे.
देवगिरी बंगल्यावर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर या विषयाला अधिकच धार आली असून त्या बैठकीत नेमके काय घडले याबाबत माहिती समोर आली आहे. देवगिरीवरील बैठकीत नेमके काय घडले, याबाबत हिरामण खोसकर यांनी स्पष्टीकरण दिले.

वाहतूक कोंडी आणि इतर बैठकींमुळे त्यांना उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली.
मात्र बैठकीतील आधीच्या चर्चेबाबत त्यांना तपशीलवार माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी नमूद केले. खोसकर यांच्या म्हणण्यानुसार, ते उशिरा पोहोचल्यामुळे प्रमुख भाषणे आणि चर्चासत्र आधीच पार पडले होते. त्यांनी तटकरे, प्रफुल्ल पटेल, तसेच वहिनी आणि पार्थ पवार यांच्याशी संवाद साधला.
त्यावेळी “हा कुटुंबीयांचा विषय आहे, पुढील निर्णय आम्ही विचार करून घेऊ” एवढीच माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विलिनीकरणाबाबत ठोस चर्चा झाली का, याबद्दल स्पष्ट उत्तर मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले. काही आमदारांशीदेखील या विषयावर संवाद झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि हा कुटुंबीयांचा विषय असल्याने बाहेरून भाष्य करणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले.