शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मोदी सरकार देणार मोठी भेट, वर्षाला मिळणार 12000 रुपये? जाणून घ्या…

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेची मर्यादा वार्षिक 6000 रुपयांवरून 12000 रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत कृषी मंत्रालयाशी संलग्न संसदीय समितीचे अध्यक्ष चरणजित सिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीने याबाबात सरकारला शिफारस केली आहे. यावर आता केंद्राचा विचार सुरू आहे.
पीएम किसान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याची मागणी सरकारकडे अनेकदा झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनीही अर्थमंत्र्यांसमोर ही मागणी केली आहे. मात्र निर्णय झाला नाही.
आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदीय समितीकडून मिळालेल्या शिफारशीच्या आधारे, अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत दिलेल्या रकमेच्या मर्यादेत वाढ होण्याची शक्यता यामध्ये वर्तवली जात आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होईल, अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत आता शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 1 फेब्रुवारी 2019 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. आता येणाऱ्या काळात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.