फडणवीस शिंदेंना बाजूला करून सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार? संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तसेच या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

दरम्यान, सध्या सुनेत्रा पवार या प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. या निवडणुकीच्या प्रचार पवार कुटुंबाकडून करण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बारामती पोटनिवडणुकीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पवार कुटुंबाच्या राजकीय प्रभावाचा उल्लेख करत विरोधकांवर जोरदार टीका केली.

आज तुम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी उभं केलं असेल, पण जर शरद पवार यांनी बारामती उभी केली नसती, तर पुढच्या कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात स्थान मिळालं नसतं, असा टोला त्यांनी लगावला. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली असून बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापल्याचे चित्र आहे.

शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का, तुम्ही कितीही मोठे झालात, अजित पवार, सुप्रिया सुळे, त्यांचे चिरंजीव असतील. तुम्ही आज राजकारणात पवार म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळे आहात. याचा विसर पडता कामा नये. तुम्ही कोण आहात किंवा आम्ही कोण आहोत, आम्ही सर्व ठाकरे या नावामुळे आहोत.
कारण ठाकरे या नावाला वैभव आणि गौरव हा बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण करुन दिला. तेच नसते तर आम्ही काय, तुमच्या पूर्वजांनी तुमच्या आडनावाला जे वलय निर्माण करुन दिले आहे. बारामती म्हणजे शरद पवार हे लक्षात घ्या.
आज तुम्हाला मोदी आणि शाहांनी उभं केलं असेल पण जर पवारांनी जर बारामती उभी केली नसती तर त्यापुढच्या कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात कोणतेच स्थान मिळाले नसते, असे संजय राऊत म्हणाले.
हे फक्त एका निवडणुकीपुरती आहे. पुढची निवडणूक बिनविरोध होणार नाही. ही निवडणूक आम्ही अजित दादांना श्रद्धांजली म्हणून पाहत आहोत. अजित दादांना मुख्यमंत्री होता आलं नाही, जर सुनेत्रा पवारांना भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर तो भाजपचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस जर त्यांचा वारसदार म्हणून एकनाथ शिंदे ऐवजी सुनेत्रा पवारांची निवड करतात की काय, असं मला जाणवत आहे, असेही त्यांनी म्हटले.