दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र होणार? ‘त्या’ एका भेटीने भाजपची धाकधूक वाढली, नेमकं काय घडतंय?


पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. दरम्यान, भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी अनेक महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत नसल्याने महापौर पदासाठी मित्र पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासत आहे.

अशा परिस्थितीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुंबई महापालिकेत भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आले असले, तरी स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेसाठी शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे.

मुंबईसह कोल्हापूरसारख्या इतर महापालिकांमध्येही अशीच स्थिती असून, सत्तेच्या गणितांसाठी विविध राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. कल्याणमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ही भेट शरद पाटील यांच्या घरी झाली असून, नेमक्या कारणांबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या भेटीमुळे दोन्ही गटांमध्ये संभाव्य जवळीक वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे.

शरद पाटील यांनी ही भेट वैयक्तिक असल्याचं सांगितलं असलं, तरी ठाकरे गटाचे दोन नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आगामी सत्ता समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भाजपसह इतर पक्षही पर्यायी समीकरणांचा विचार करत आहेत. अशा वेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांतील हालचालींमुळे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. या घडामोडींमुळे महापौर निवडीपासून सत्तास्थापनेपर्यंतच्या प्रक्रियेत मोठे बदल होऊ शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!