वारकऱ्यांवर लाठीचार का झाला? अखेर आळंदी प्रशासनाने सोडले मौन..

पुणे : आळंदीत इतिहासात प्रथमच वारीदरम्यान वारकऱ्यांवर लाठीचार करण्यात आला. या घटनेचा अनेकांनी निषेध व्यक्त केला. या प्रकरानंतर पाच दिवसांनी आळंदी मंदिर प्रशासनाने मौन सोडले आहे. हा प्रकार कसा घडला अन् कसा टाळता आला असता, हे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.
मंदिर प्रशासनाने म्हटले आहे की, मंदिरात प्रस्थानाला होणाऱ्या गर्दी बाबत चर्चा सुरू होती. त्या संबंधी मान्यताप्राप्त वास्तू विशारद संस्थेकडून अभ्यास करून मंदिरातील प्रदक्षिणा मार्गावर साधारणपणे ४५०० हजार लोक सुरक्षित वावरू आणि खेळू शकतील, हे समोर आले.
त्यानुसार ४७ दिंडीतील ७५ वारकऱ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असताना जोग वारकरी शिक्षण संस्थेतील ३०० ते ४०० विद्यार्थ्यांनी मंदिरात प्रवेश घेण्यासाठी आले. या विद्यार्थ्यांनी मंदिरात प्रवेशासाठी पोलिसांशी हुज्जत घातली.
त्यातील ३५ जणांना प्रवेश देण्याचे मान्य केले तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी बळजबरीने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि पुढची कारवाई झाली. विद्यार्थी सामंज्यस्याने वागले असते तर हे घडले नसते असं मंदिर प्रशासनाने स्पष्ट केल.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी लाठीमार झाला नसून फक्त वारकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला, असा दावा केला होता. यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.