शंभर वर्षे काय होणार नाही म्हणणारे आता शंभर दिवसातच निकृष्ठ काम उघड, राजकोटमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचा भराव खचला..

मालवण : काही दिवसांपूर्वी निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळं मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता आणि आता नव्याने उभारलेल्या पुतळ्याला शंभर वर्षे काहीही होणार नाही असा दावा सरकारने केला होता. असे असताना एक धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

याठिकाणी पुतळ्याच्या अनावरणाला शंभर दिवसही झाले नसताना पुतळ्याच्या चबुतऱ्याचा भराव खचला आहे. यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. यावरुन हे सरकार महापुरुषांचे पुतळे विचारांचा आदर्श आणि प्रेरणा म्हणून उभारतंय की केवळ ठेकेदारांसाठी, असा प्रश्न पडतो. याबाबत आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट केली आहे.
यामध्ये रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. आमदार रोहित पवार म्हणाले, विचारांनाच खोली नसेल तर अशा सरकारकडून पुतळ्याच्या भक्कम पायाची अपेक्षा कशी करणार? आता यावर तात्पुरती डागडुजी केली जाईल पण महिन्याभरात भराव कसा खचला याचं उत्तर सरकारने द्यावं.असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच रोहित पवार म्हणाले की, भराव खचल्याचा अर्थ हे कामसुद्धा निकृष्ट दर्जाचं आहे, हे दिसतं आणि शिवप्रेमी म्हणून आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही. सरकारने याची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी. अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. यामुळे आता सरकार याबाबत काय उत्तर देणार आणि कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मालवणच्या समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा काही महिन्यांपूर्वी वादळी वारा आणि पावसामुळं कोसळला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्या आठ महिन्यांपूर्वीच या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं. उद्घाटनानंतर आठ महिन्यांत हा पुतळा कोसळला होता.