पवार कुटूंबात नेमकं चाललंय काय? शरद पवारांची स्फोटक पत्रकार परिषद, केले मोठे खुलासे, म्हणाले, ‘ते’ चार नेते…

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडताना दिसत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज सायंकाळी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

अजितदादांच्या मृत्यूनंतर अवघ्या ७२ तासांत हा शपथविधी पार पडत आहेत. या घाईघाईत उरकल्या जाणाऱ्या शपथविधीबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, शपथविधी आधीच पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी खळबळ उडवून दिली आहे.


१५ मिनिटांच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत पवारांनी अप्रत्यक्षपणे चार नेत्यांना व्हिलन बनवल्याचं दिसून येत आहेत. आज सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे. याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. हा निर्णय घेण्यापूर्वी आपल्याशी कोणतीही चर्चा केली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि पार्थ पवार यांनीच हा निर्णय घेतल्याचं पवारांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांनी पक्षांतर्गत बैठक घेऊन हा निर्णय घेतला असावा, असं वक्तव्य पवारांनी केलं. पवारांनी थेट कुणावरही आरोप केला नसला तरी पवार कुटुंबाला चर्चेत न घेता हा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, १५ मिनिटांच्या या स्फोटक पत्रकार परिषद शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, पार्थ पवार पर्यायाने सुनेत्रा पवार यांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला. कारण ज्यादिवशी अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच रात्री बारामतीतील सिटी इन हॉटेलमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांच्यात बैठक झाली.
या बैठकीनंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तातडीने मुंबईला रवाना झाले. त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीत सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घाईघाईने घेण्यात आल्याचं सूचित करण्याचा प्रयत्न पवारांनी केला.
