राज्याच्या अर्थसंकल्पात नेमकं काय? पायाभूत सुविधांवर महायुती सरकारचा भर, जाणून घ्या….

मुंबई : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सोमवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडला. अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश दाखवले. त्यासाठी लाडक्या बहिणींचा आभार मानले.
अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत महत्त्वाच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात आली आहे. त्यात राज्यातील महत्वकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत महत्वाची घोषणा करण्यात आली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट, २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल.
दरम्यान, मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतमिान व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे ६४ हजार ७८३ कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
पुणे ते शिरुर या ५४ किलोमीटर लांबीच्या ७ हजार ५१५ कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या २५ किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी ६ हजार ४९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा ५५ किलोमीटर लांबीचा ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
पुणे मेट्रो रेल्वे टप्पा-२ अंतर्गत खडकवासला – स्वारगेट – हडपसर- खराडी आणि नळ स्टॉप-वारजे- माणिकबाग या दोन मार्गिकांचा ९ हजार ८९७ कोटी रुपये किंमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
समृद्धी महामार्गाचे ९९ टक्के काम पूर्ण..
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी ६४ हजार ७५५ कोटी रुपये खर्च झाला आहे. इगतपुरी ते आमणे हा ७६ किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल. या महामार्गालगत ऍग्रो-लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरविण्यात येतील. याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतक-यांना होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.