Weather Update : पाकिस्तानी वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापला, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा…

Weather Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमानात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मार्गे वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यांमधील उष्णता वाढली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ताशी ३५ ते ४० किमी वेगाने उष्ण वारे गुजरातमध्ये वाहत आहे. दणिणोत्तर हवेच्या निर्वात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वारे महाराष्ट्रात देखील येत आहे. परिणामी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. Weather Update
मुंबईसह कोकण किनारपट्टी, सह्याद्री घाटमाथा, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुढील आणखी काही दिवस याचा त्रास होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
सर्वाधिक तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यात…
बुधवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यात झाली. धुळ्यात तापमानाचा पारा चाळीशीपार गेला होता. मुंबईतही दिवसभर दमट वातावरण होते. त्यामुळे नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. अनेकांना या उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागला.