कोणी पाणी देता का पाणी ? पुण्यात महापालिकेत समाविष्ट गावांची पाण्यासाठी वणवण….!

पुणे : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. यामुळे पाण्याची गरज वाढू लागली आहे. असे असताना आता गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी या गावांचा महापालिकेत समावेश होऊन दोन वर्षे होऊन गेली. मात्र, अद्याप याठिकाणी पाण्यासाठीची आहे तीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.
याठिकाणी नागरिकांची कायम पाण्यासाठी वणवण होत आहे. या भागातील रहिवाशांचे पाण्यावाचून हाल होत असून, परिसराचा महापालिकेत समावेश होऊनही नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.
उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. या भागाचा महापालिकेत समावेश असल्याने रहिवाशांना महापालिकेचा कर भरावा लागत आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेपासून वंचित रहावे लागते.
मागील वर्षापासून महापालिकेकडून ठेवण्यात आलेल्या टाक्यांमध्ये टँकरने पाणी सोडण्यात येते. त्यानंतर या ठिकाणांवरून नागरिकांना पाणी घेऊन जावे लागत असल्याने आम्ही कर का भरायचा? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दक्षिण पुण्यातील गावे अद्याप तहानलेलीच आहेत. पायाभूत सुविधांसाठीही महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. पाणी, ड्रेनेज, कचरा, रस्ते, हे प्रश्न महापालिकेत समावेश झाल्यानंतर सुटतील, अशी नागरिकांची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही.