अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत ग्रामस्थ आक्रमक! बारामतीत घेतला मोठा निर्णय…

बारामती : अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी सकाळी ८.१० वाजता मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळाजवळ पोहोचण्याआधीच त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला.

सुरुवातीला सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमधून दुर्घटनेची तीव्रता स्पष्ट झाली. काही वेळातच अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि राज्यभर शोककळा पसरली
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दिवसेंदिवस संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. अपघात की घातपात याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून राज्य सरकारने या अपघाताची सखोल चौकशी करावी आणि सत्य बाहेर आणावे या मागणीसाठी बारामती तालुक्यातील लोणी भापकर गाव काल बंद ठेवण्यात आले.

अशातच आता याप्रकणी अधिकृत चौकशी सुरू असतानाच स्थानिक ग्रामस्थांनीही मोठा निर्णय घेतला आहे. बारामती तालुक्यातील डोरलेवाडी गावातील ग्रामस्थांनी यासाठी आज बंदचे आवाहन केले. अपघात की घातपात या प्रश्नामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी राज्य सरकारने तातडीने सर्व बाजूंनी चौकशी करावी, अशी भूमिका घेतली आहे.
घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या समोर येत आहेत. त्यापैकी एका व्हिडीओमध्ये विमान हवेतच एका बाजूला झुकताना स्पष्ट दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या दुर्घटनेमागील कारणांबाबत अधिकृत अहवालाची प्रतीक्षा लागली आहे. राज्य सरकारने या अपघाताची सर्वंकष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी अधिक तीव्र होत चालली आहे.